झरे नगरीत ३५ वा अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात संपन्न

झरे (प्रतिनिधी):

आटपाडी तालुक्यातील झरे येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला ३५ वा अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व नामसप्ताह नुकताच अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ ते सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा उत्सव पार पडला. या आठ दिवसांच्या काळात झरे नगरीसह संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता.

सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे भूपाळी, काकड आरती, ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, सायंकाळी हरिपाठ, प्रवचन सेवा, रात्रीची कीर्तन सेवा, भजन आणि जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः आळंदीकर महाराज मंडळींच्या उपस्थितीने या संपूर्ण सोहळ्याला मोठी शोभा आणली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी गावातून भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’ च्या जयघोषात निघालेल्या या दिंडीने संपूर्ण गावाला नगर प्रदक्षिणा घातली. या दिंडी सोहळ्यात अबालवृद्धांसह महिला भाविकांनी मोठा सहभाग नोंदवला होता.

या सोहळ्यात गणपत अर्जुन, भीमराव माने, मल्लिकार्जुन ढोले, सोमनाथ गाडे गुरुजी, गोविंद पाटील, सुजाता मोटे आणि पांडुरंग लोहार कलेढोण यांनी आपल्या रसाळ वाणीतून प्रवचन सेवा रुजू केली. रात्रीच्या सत्रात नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये लक्ष्मण धोंगडे महाराज, लीलाताई खाडे, राहुल शामगावकर, गणेश वारंगे बीड, राहुल फडतरे दिघंची, संभाजी पुकळे झरे आणि वैष्णवी लोहार झरे यांची कीर्तने झाली. सोमवारी नवनीत महाराज करगणीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची अतिशय उत्साहात सांगता झाली. यावेळी हजारो भाविकांनी काल्याच्या प्रसादाचा लाभ घेतला.

या संपूर्ण सप्ताहासाठी मंगल वाघमारे, महादेव कारंडे गुरुजी, सदाशिव भानुसे, संतोष माने, राहुल गोरड, संदीप कातुरे, औदुंबर यादव, गजानन पडळकर आणि विलास पाटील यांनी कीर्तन सेवेचे सौजन्य दिले होते. पारायण मंडळाचे अध्यक्ष तथा सरपंच अंकुशराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत नेटका आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

सप्ताहाच्या यशस्वी नियोजनासाठी गजानन राजमाने (माजी सरपंच झरे), सचिन राजमाने, पिंटू राजमाने, विजय अनुसे आणि तातोबा पाटील यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. गेल्या ३५ वर्षांची ही गौरवशाली परंपरा ग्रामस्थांच्या एकीमुळे आणि दातृत्वामुळे आजही मोठ्या उत्साहात टिकून असून या धार्मिक उत्सवामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण चैतन्यमय आणि भक्तीमय झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *