पाण्याअभावी दुर्गंधीचे साम्राज्य
बिदाल प्रतिनिधी :
माण तालुक्यातील दहिवडी येथील कृषी कार्यालयात सध्या समस्यांचे फुटवे फुटले आहेत. कार्यालयातील मुतारी आणि स्वच्छतागृहामध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
शेतकऱ्यांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष
तालुकास्तरावरील महत्त्वाचे कार्यालय असल्याने येथे दररोज शेकडो शेतकरी विविध कामांसाठी येत असतात. मात्र, येथील प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पाण्याअभावी अस्वच्छता वाढली असून परिसरात उग्र दर्प पसरला आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याचा कडाका वाढला असताना स्वच्छतेचा हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
कृषी सहाय्यकांच्या कामकाजावर नाराजी
स्वच्छतेच्या प्रश्नासोबतच कृषी सहाय्यकांच्या कार्यपद्धतीवरही शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सध्या उन्हाळी हंगाम सुरू झाला असताना कृषी सहाय्यक गावोगावी फिरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नाहीत. अनेक शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही,” अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
डिजिटलायझेशनचा आधार, कामात हलगर्जी?
शासनाने अनेक योजना ऑनलाईन केल्यामुळे कृषी सहाय्यकांकडे आता क्षेत्रीय कामासाठी पुरेसा वेळ असतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, तरीही मार्गदर्शन मिळत नसल्याने “योजना ऑनलाईन झाल्यामुळे कृषी सहाय्यकांना कामच उरले नाही का?” असा उपरोधिक सवाल शेतकरी विचारत आहेत.
..
