
म्हसवड | प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मान तालुक्यातील भाटकी गावात मोठा राजकीय बदल पाहायला मिळाला आहे. भाटकी गावातील अनेक युवक व ग्रामस्थांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर आणि विकासकामांवर विश्वास ठेवत त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
जयकुमार गोरे यांनी भाटकी गावात राबवलेली विविध विकासकामे, माळरान भागात जिहे–कटापूर योजनेचे पाणी आणून भरलेले तलाव तसेच भविष्यातील विकासाचा स्पष्ट आराखडा पाहून या ग्रामस्थांनी भाजपची वाट धरल्याचे सांगण्यात आले. यामुळे मान तालुक्यातील पूर्व भागात भाजपची ताकद वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
आज भाजपमध्ये प्रवेश केलेले बहुसंख्य कार्यकर्ते यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित होते. मात्र मागील दहा ते पंधरा वर्षांत केवळ आश्वासनांपलीकडे ठोस विकास न झाल्याने ते नाराज होते. जयकुमार गोरे यांची काम करण्याची पद्धत, विकासाचा ‘स्ट्राइक रेट’ आणि प्रत्यक्षात दिसणारे परिणाम यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
भाजपमध्ये नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये
कालिदास शिर्के, शिवाजी पांडुरंग शिर्के, नवनाथ प्रभाकर शिर्के, गोरख प्रभाकर शिर्के, पैलवान लक्ष्मण अहिवळे, मधुकर रकटे, ब्रह्मदेव शिर्के, अजित तुकाराम शिर्के, प्रल्हाद शिर्के, रघुनाथ शिर्के, अमोल अहिवळे, सचिन दिलीप शिर्के, नानासो सावंत आदींचा समावेश आहे.
या सर्व नव्या कार्यकर्त्यांचे भाटकी गावातील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक स्वागत केले. आगामी निवडणुकांमध्ये नव्या उमेदीने आणि जोमाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

