म्हसवड (वार्ताहर )—-
माण तालुक्यातील म्हसवड शहरालगत धुळदेव गावच्या हद्दीत आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सातारा येथील डॉ. क्रांतिसिंह रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सातारा (कोडोली) येथील निकम कुटुंब देवदर्शनासाठी पंढरपूरकडे आल्टो कारने निघाले होते. सकाळी ९ नंतर म्हसवडहून पुढे जात असताना धुळदेव गावाजवळ रस्ता उखडलेला असल्याने चालकाचा अंदाज चुकला. अचानक ब्रेक लावल्याने कारने तीन ते चार पलट्या घेतल्या. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच धुळदेव ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले व म्हसवड पोलिसांना कळवले. पोलिस कर्मचारी अभिजीत भादुले, लुबाळ व हांगे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे जखमींना म्हसवड येथील संचित रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले.
दरम्यान, या अपघातानंतर धुळदेव ग्रामस्थ संतप्त झाले असून या दुर्घटनेस प्रशासनालाच जबाबदार धरले जात आहे. सातारा–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील धुळदेव परिसरातील रस्त्याचे काम मागील आठ वर्षांपासून रखडलेले आहे. यासाठी ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नाही.
या ठिकाणी आतापर्यंत सुमारे २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक लहान-मोठे अपघात घडले आहेत. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल धुळदेव ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
