अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता, सातारा जिल्ह्यात जल्लोष.

सत्य परेशान होऊ शकतं, पराजित नाही; आम आदमी पार्टीचा विजय ऐतिहासिक

सातारा जिल्हा उपाध्यक्ष सोहम शिर्के यांची प्रतिक्रिया; सातारा जिल्ह्यात जल्लोष

बिदाल प्रतिनिधी दि

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याच्या पार्श्वभूमीवर, सातारा जिल्हा उपाध्यक्ष सोहम शिर्के यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा विजय केवळ पक्षाचा नसून प्रामाणिक राजकारणाचा आणि सर्वसामान्य जनतेचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सोहम शिर्के यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “आजचा दिवस हा लोकशाहीसाठी ऐतिहासिक आहे. सत्ताधारी पक्षाकडून आम आदमी पार्टी आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध जे षडयंत्र रचले जात होते, ते आज न्यायालयाने हाणून पाडले आहे. अरविंद केजरीवाल यांनी २०१४ पासून दिल्लीत वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात जे क्रांतीकारी काम केले, त्यामुळे घाबरलेल्या सरकारने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता.”

न्यायालयाच्या या निर्णयामुळे आम आदमी पार्टी हा खरोखरच भ्रष्टाचारमुक्त आणि देशाला नवी दिशा देणारा पक्ष आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कितीही दबाव आणला किंवा अत्याचार केला तरी सत्य कधीही झुकत नाही, हेच या निकालातून समोर आले आहे, असेही शिर्के यांनी नमूद केले.

या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, सातारा जिल्हा आणि माण-खटाव सारख्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आम आदमी पार्टीची विचारधारा घराघरात पोहोचवण्याचा संकल्प सोहम शिर्के यांनी व्यक्त केला. “आम्ही कोणत्याही दबावाला बळी न पडता सामान्य जनतेच्या न्यायासाठी, हक्कासाठी यापुढेही लढा देत राहू,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील ‘आप’ कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *