भारतीय सैन्यदलातील २४ वर्षांच्या सेवेला सलाम! हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे यांचा ६ सप्टेंबरला सेवानिवृत्त गौरव सत्कार सोहळा पंढरपूर : प्रतिनिधी भारतीय सैन्यदलामध्ये तब्बल २४ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत भारतमातेचे संरक्षण करणारे हवालदार श्री. विक्रम राजाराम नाईकनवरे हे सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ आणि गौरवास्पद सेवेनिमित्त रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी पंढरपूर येथे सेवानिवृत्त गौरव सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशसेवेचा अभिमानास्पद प्रवास पूर्ण करून मायभूमीत परतणाऱ्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांच्या सन्मानार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, भारतीय जवानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. भव्य रॅलीने होणार कार्यक्रमाला सुरुवात रविवारी सकाळी नियोजित कार्यक्रमानुसार दुपारी १२ वाजता भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता सेवानिवृत्त गौरव सत्कार सोहळा होणार आहे. यानंतर उपस्थितांसाठी दुपारी १२ ते ४ या वेळेत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. “वर्दीचा सन्मान! तिरंग्याचा अभिमान!!” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विराट मंगल कार्यालयात सोहळा हा गौरव सोहळा विराट मंगल कार्यालय (फरातळी दिंडी मठ), भक्ती मार्ग रोड, गाडगेबाबा चौक, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण श्री. दीपक राजाराम नाईकनवरे यांच्या वतीने देण्यात आले असून, स्व. राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठान व सामाजिक संस्था, संतपेठ पंढरपूर, पंढरपूर तालुका माजी सैनिक संघटना तसेच मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटना यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या रक्षणासाठी आयुष्याची बहुमोल वर्षे समर्पित करणाऱ्या जवानाचा सन्मान करण्यासाठी आयोजित या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Post navigation सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचा ४ सप्टेंबर रोजी भव्य मेळावा सायगावातील रस्त्याची झाली दुरावस्था,, काहींना त्याची उरली नाही आस्था