दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे –
दहिवडी कॉलेजमधील वादग्रस्त शिक्षकांच्या कथित गैरप्रकार, आर्थिक अनियमितता आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षकांच्या बदलीसाठी पत्रकार तथा डिजिटल मिडियाचे सातारा जिल्हा प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे यांनी दहिवडी कॉलेजसमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणामुळे दहिवडीसह माण तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दहिवडी कॉलेज येथील शिक्षक संजय खेत्रे आणि विष्णू म्हस्के हे विविध वादांमध्ये अडकले असून त्यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहारासह अनेक गंभीर तक्रारी असल्याचा आरोप उपोषणकर्ते एकनाथ वाघमोडे यांनी केला आहे. या प्रकरणी रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील मुख्य कार्यालयातून चौकशी सुरू असल्याची माहिती असून, चौकशी निःपक्षपाती व पारदर्शक व्हावी यासाठी संबंधित शिक्षकांची तातडीने बदली होणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका वाघमोडे यांनी मांडली आहे.
दहिवडी कॉलेज हे माण तालुक्यासह आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. विविध गावांमधून हजारो विद्यार्थी उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने घेऊन येथे शिक्षणासाठी येतात. मात्र, गंभीर आरोप असलेले आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले शिक्षक विद्यादानाचे पवित्र कार्य योग्यरीत्या करू शकत नाहीत, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. अण्णा भाऊ साठे आणि रयत शिक्षण संस्थेच्या विचारधारेस तिलांजली देणारे कृत्य या शिक्षकांकडून होत असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला.
सध्या दहिवडी कॉलेजशी संबंधित अनेक गंभीर विषय दहिवडी परिसरात चर्चेत असून, विशेषतः नॅक (NAAC) मूल्यांकनाच्या काळात विविध कामांमध्ये झालेला कथित गोलमाल हा मुद्दा दहिवडी पंचक्रोशीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. या सर्व बाबींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
दरम्यान, या आमरण उपोषणाची दखल प्रशासन, रयत शिक्षण संस्था तसेच संबंधित शैक्षणिक यंत्रणांकडून कधी घेतली जाते आणि पुढील काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण दहिवडी परिसराचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया :
“बापूबीरूंच्या कार्याचा आणि यशवंतराव होळकरांच्या लढवय्या वारशाचा मी योद्धा आहे. अन्यायी आणि भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन.”
