मायणी प्रतिनिधी- – धोकादायक रस्त्यामुळे वाहनाची झालेली अवस्था)

पडळ ते पाटीलवस्ती, मधलावाडा आणि माळवेवस्ती जोडणारा मुख्य रस्ता नूतनीकरणाच्या नावाखाली धोकादायक बनवण्यात आला आहे.अशी तक्रार पडळ मधील युवकांनी केली आहे. रस्ता इतका अरुंद करण्यात आला आहे की गेल्या दोन महिन्यांत गॅस सिलेंडरची गाडी आणि शाळकरी मुलांची गाडी पलटी झाली. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही, पण उद्या काही गंभीर घडले तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
गावाच्या विकासासाठी येणारा निधी खरोखर विकासासाठी वापरला जातो आहे का, की फक्त कागदावर कामे दाखवली जात आहेत? रस्त्याचे काम करताना दर्जा, मोजमाप आणि सुरक्षिततेचे निकष पाळले गेले का? की काही जणांच्या फायद्यासाठी गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ केला जातो आहे?
गावात एकाच कंत्राटदाराला वारंवार कामे कशी मिळतात? पात्र आणि अनुभवी कंत्राटदार नाहीत का? ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी या कामांबाबत मौन का बाळगून आहेत? कारखान्याचा कर आणि इतर निधी नेमका कुठे खर्च होतो याचा खुलासा ग्रामसभेत तात्काळ करण्यात यावा.
जर तात्काळ रस्त्याचे रुंदीकरण, कामाची चौकशी आणि दोषींवर कारवाई झाली नाही, तर ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने आवाज उठवावा लागेल.
