….
(अजित जगताप )
सातारा दि: सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समिती निवडणुका होऊन तीन आठवडे झाले आहेत. अनेक जण सहलीवरून परतले असले तरी अद्याप सातारा जिल्हा परिषद निवडी होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे आता राष्ट्रवादी व शिवसेनेने भाजपला इशारा दिला आहे. आला तर तुमच्या सोबत नाहीतर तुमच्या विना.. असा सूर उमटत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी २० मार्च ही अंतिम तारीख आहे. त्यापूर्वीच महायुती व महाविकास आघाडीला निर्णय घ्यावा लागणार आहे .सातारा जिल्ह्यामध्ये अकरा पंचायत समिती पैकी सातारा, कराड आणि खटाव मध्ये भाजप स्वबळावर निवडून येऊ शकते. तसाच प्रकार खंडाळा, कोरेगाव, वाई मध्ये राष्ट्रवादी आणि पाटणला शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतात. हे सिद्ध झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाकडे सत्तावीस व एक अपक्ष असे २८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे २० शिवसेनेकडे १५, राष्ट्रीय काँग्रेसचे व स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. सदस्यांचे मत अजमावल्यानंतर भाजपला नमतेपणा घ्यावा लागला आहे. ही संधी साधून राष्ट्रवादी व शिवसेनेने आला तर तुमच्या सोबत अन्यथा तुमच्या विना असे स्पष्ट सांगून आपला राजकीय इरादा स्पष्ट केला आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा देणाऱ्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना राजकीय दृष्ट्या घरात जिल्हा परिषद महिला अध्यक्ष उमेदवार असूनही अध्यक्षपदापासून दूर जावे लागत आहे. हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पद इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असल्यामुळे या जागेवर प्रमुख दावेदार म्हणून पाटण, कोरेगाव व खटाव आणि कराड तालुक्यामधून इच्छुकांची मोर्चा बांधणी सुरू झालेली आहे.
मुंबईमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन असल्यामुळे महायुती मधील प्रमुख घटक पक्षाने एकमेकांशी संवाद ठेवला असला तरी महायुती म्हणजे राष्ट्रवादी व शिवसेना, काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना असा त्यातून अर्थ निघत आहे. भाजपला महायुती म्हणून सहभागी व्हायचा असेल तर त्यांना सभापती पद मिळू शकते असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. दोन पंचायत समितीमध्ये पक्षीय बलाबल समान असल्यामुळे त्याचाही विचार करावा लागणार आहे असे दिसते.
