सातारा जि. प. अध्यक्ष, राष्ट्रवादीकडून चार तर सेनेकडून दोन नावांची चर्चा


(अजित जगताप)
सातारा, दि. ९ : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकी मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणूकीत स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर महायुतीच्या बैठकीकडे पाठ फिरवली होती. हा अवमान सहन न झाल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार गटाने सातारा जिल्ह्यात मोट बांधली. भाजपच्या निष्ठावंत शिलेदारांनी ही भाजप विरोधात काम केले. त्यामुळे भाजपाला जिल्हा परिषद सत्ता स्थापन करण्यासाठी अपयश आले आहे. वरिष्ठ पातळीवर कितीही हालचाली केल्या तरीसुद्धा सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे जाण्याची दाट शक्यता आहे.
सातारा जिल्हा परिषद सत्तेच्या वाटणीमध्ये सेनेलाही सकारात्मक चर्चेनंतर समाविष्ट होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आपला पाटणचा गड चांगला राखला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ .शशिकांत शिंदे यांनी कुसुंबी जि.प.गटात शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नीचा तसेच कुसुंबी गण आणि आंबेकर गणात पराभव करण्यासाठी शिवसेनेशी हातमिळवणी केली. तसेच म्हसवे गणात भाजपाचा पराभव करुन राष्ट्रवादीच्या सौ.शिल्पा मिलिंद शिंदे यांना निवडून आणले आहे. राष्ट्रवादीचे दिपक पवार यांचा करिष्मा कुडाळ गटात टिकू शकला नाही. हे मताच्या फरकावरून स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे महिला अध्यक्ष पदासाठी वाठार स्टेशन गट – जयश्री राजेंद्र भोसले, कुडाळ गट जयश्री सुहास गिरी, बुध गट : लता अविनाश कर्णे, औंध गट : मनिषा योगेश फडतरे, तर शिवसेनेच्या मल्हारपेठ गट – विजया कुंभार व मारुल हवेली गटाच्या योगिता संतोष गिरी या इतर मागासवर्गीय महिला निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील, आ.शशिकांत शिंदे व पालकमंत्री शंभुराज देसाई यांचा सामुदायिक निर्णयाने ज्यांच्या नावाची शिफारस करेल त्यांच्या गळ्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे माळ पडणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
यापूर्वी कोरेगाव तालुक्यातील किन्हई मधील सौ.जयश्री राजेंद्र भोसले यांनी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती पद तसेच महिगाव तालुका जावळीच्या सौ. जयश्री सुहास गिरी यांनी पंचायत समिती सभापतीपद भूषविले आहे. या दोन्ही महिलांना अनुभव आहे. इतर महिलासुद्धा सक्षम असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार? हे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, भाजपला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळवण्यासाठी आवश्यक संख्याबळ प्राप्त झालेले नाही. तसेच फोडाफोडीचे राजकारण कुणी करणार नाही. त्यामुळे भाजपला विरोधी पक्षातच बसावे लागणार आहे. असे सध्या तरी चित्र आहे.


चौकट-
राज्यात व केंद्रात भाजपा व सेना महायुतीचे सरकार आहे. परंतु सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद मध्ये महायुती-आघाडीचे सरकार स्थापण होणार…हा एक एैतिहासिक आणि नाट्यमय राजकीय परिवर्तन ठरेल का..याकडे सर्व जिल्हा वासियांप्रमाणेच राज्याचेही लक्ष लागले आहे.
चौकट-
भारतीय जनता पक्षामध्ये इतर मागासवर्गीय महिला कराड-काले गटातील सौ.मनिषा दयानंद पाटील, विंग गटातील सौ.शैलेजा प्रदिप शिंदे, कोडोली गटामधील सौ.निता बाळासाहेब खरात निवडून आल्या आहेत. त्यांच्यासाठी भाजपा मोठी ताकद उभी करणार असल्याची चर्चाही सुरु झाली आहे.
चौकट-
या निवडणूकीमध्ये खर्‍या अर्थाने घराणेशाहीला तिलांजली दिली आहे . सर्वसामान्य कुटुंबातील इतर मागासवर्गीय महिलांना संधी मिळणार असल्याने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यात खर्‍या अर्थाने महिलांच्या कर्तबगारीला चांगली जोड मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *