लिंगायत दफनभूमीसाठी वन खात्याची जागा देणार
वनमंत्री नाईक यांच्याकडील बैठकीत निर्णय.

सांगोला प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्र राज्यातील लिंगायत धर्म संस्कृती इतरांपेक्षा वेगळी असून त्यांच्या दफन भूमिसाठीची मागणी आल्यास त्वरीत वन विभागाची जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी हमी देऊन त्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
सोलापूरचे माजी आमदार व लिंगायत नेते शिवशरण अण्णा पाटील आणि लिंगायत चळवळीचे अभ्यासू समाजसेवक डाॅ.बसवराज बगले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वनमंत्री नाईक यांची भेट घेतली.राज्यातील प्रत्येक गावात लिंगायत समाजासाठी स्वतंत्र दफनभूमीची जागा देण्याची मागणी केली.त्यानुसार मंत्री नाईक यांनी संबधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
ज्या गावात स्मशान भूमीसाठी जागा अपुरी असेल, गायरान आणि गावठाणाची जागा शिल्लक नसेल,अशा ठिकाणी जवळपास राखीव वन विभागाची जमीन असेल आणि तशी मागणी आली तर त्वरीत स्मशान भूमीची जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत केली जाईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.लिंगायत धर्मात अतिम संस्काराची वेगळी पद्धत आहे,अनेक ठिकाणी त्यांची स्वतंत्र दफनभूमी नाही,तशी मागणी आल्यावर त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यास वन विभाग कटिबद्ध आहे.अशी हमी या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
जुळे सोलापूरच्या कंबर तलावाजवळील 22 गृहनिर्माण संस्थांच्या नागरिकांना वन विभागाची जागा त्वरीत हस्तांतरीत करून त्यांना मालकी हक्क मिळावेत,काशी विश्वनाथ मंदिराच्या लिंगपुजेसाठी भाविकांना स्वतंत्र रहदारी द्यावी.आणि गुरूदेव समाजसेवा मंडळाच्या जागेत धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमासाठी स्वतंत्र जागेचा ताबा द्यावा आदि मागण्यांचे निवेदन देऊन शिवशरण अण्णा पाटील आणि डाॅ.बसवराज बगले यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली.या सर्व विषयात तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश वनमंत्री नाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी सोलापूरचे उपवन संरक्षक कुलराजसिंह,कोल्हापूरचे लिंगायत नेते धनंजय महाजन,मदन पोलके सर,गंगाधर स्वामी आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *