
म्हसवड, प्रतिनिधी :
माणदेशी रेडिओच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “श्रोत्यांचा स्नेह मेळावा” अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. श्रोते, कार्यक्रम निर्माते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात माणदेशी रेडिओचे प्रोग्राम डायरेक्टर गुरव यांच्या प्रभावी प्रस्ताविकाने झाली. आपल्या प्रस्ताविकामध्ये त्यांनी सांगितले की, माणदेशी रेडिओची स्थापना १७ नोव्हेंबर २००८ रोजी झाली असून तेव्हापासून विविध सामाजिक, माहितीपूर्ण व मनोरंजनपर कार्यक्रम रेडिओवरून प्रसारित केले जात आहेत.
रेडिओवरून श्रोत्यांना फक्त आवाज ऐकू येतो, मात्र त्या आवाजामागील व्यक्ती कशी आहे, याची ओळख व्हावी आणि श्रोते व कार्यक्रम निर्माते यांच्यात प्रत्यक्ष भेट घडून येऊन स्नेहबंध अधिक दृढ व्हावेत, या उद्देशाने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विविध प्रोग्रामशी निगडित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत माणदेशी रेडिओच्या सामाजिक व माहितीपूर्ण कार्याचे मनापासून कौतुक केले. यावेळेस माणदेशी रेडिओ ऐकण्यासाठी प्लेस्टोर वरती माणदेशी तरुण वाहिनी ॲप डाऊनलोड करून घ्या आणि मानदेशी रेडिओ ऐका असे आवाहन करण्यात आले
या प्रसंगी अॅड. शैलजा मुळक (पुणे), पूनम देवल (मिरज), जया राजाराम (इचलकरंजी), संगीता दरेकर (खटाव), जयश्री ननवरे (सिद्धेश्वर कुरोली) यांच्यासह म्हसवड येथील वनपाल अधिकारी संजीवनी खाडे, नगरसेविका स्नेहल सूर्यवंशी, ज्योतिष तज्ञ ज्योती बनसोडे माळी व सुवर्णा ओतारी यांनी आपल्या विचारांनी कार्यक्रमाला चारचांद लावले.
यावेळी उत्कृष्ट श्रोते म्हणून सावता लिंगे व मीना मंगरुळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व प्रोग्राम निर्मात्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आणि इतर श्रोत्यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, माणदेशी तरंग वाहिनीचे संचालक शिवाजी यादव, रवींद्र शहा, डॉ. पिंजारी मॅडम, डॉ. तेजस्विनी होरा आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन ढवण यांनी अत्यंत ओघवत्या आणि प्रभावी शैलीत केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणदेशी तरंग वाहिनीच्या टीमने घेतलेल्या परिश्रमांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
एकूणच, हा स्नेह मेळावा श्रोते, कार्यक्रम निर्माते आणि रेडिओ यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करणारा ठरला.

